शेतात रक्षा विसर्जन करून झाला पर्यावरण पूरक विधी.निसर्गाला जपत मेतकर परिवाराने उचलले पुरोगामी पाऊल..


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

मृत्यू अंतिम सत्य असते तरी मळलेल्या वाटेने न जाता प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे धाडस सौन्दळा येथील मेतकर परिवाराने दाखवून पर्यावरण जपण्याचा पायंडा पाडला आहे.येथील मनोहरराव मेतकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आजाराने निधन झाले.त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची मुले मुरलीधर, सुरेश व ज्ञानेश्वर यांनी रक्षेचे विसर्जन शेतात करून सौन्दळा सारख्या छोट्याशा गावात पुरोगामी पाऊल उचलले.सहसा पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेल्या प्रथा-परंपरा-रिती-रिवाज मोडण्याचे धाडस कोणी करत नाही.विशेषतः मरण प्रसंगी लोक भावूक होतात.आपण करत असलेली कृती योग्य की अयोग्य याचा विचार न करता प्रथेनुसार चालत आलेले कर्मकांड करण्याकडेच बहुतेकांचा कल असतो.सर्वसाधारणपणे अस्थी व रक्षेचे विसर्जन नदीत केले जाते.त्यामुळे जलप्रदूषण होऊन जीवसृष्टी धोक्यात येते.असे होऊ नये व समाजात सत्यशोधकीय संदेश जावा या हेतूने मेतकर परिवाराने हा पर्यावरण पूरक धाडसी निर्णय घेतला आहे.सौन्दळा सारख्या छोट्या खेड्यात मेतकर परिवाराने घेतलेल्या या पर्यावरण पूरक धाडसी निर्णयाचे हिवरखेड येथील संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीने स्वागत केले असून सर्वांनी मेतकर परिवाराचे अनुकरण करावे असे आवाहन सुद्धा केले आहे.

प्रतिक्रिया---

 मेतकर परिवाराचे प्रेरक पाऊल

अशा प्रसंगात लोक भावनिक होतात.समाजाच्या प्रथा पाळण्याकडेच बहुतेकांचा कल कल असतो.अशावेळी मेतकर परिवार ठाम राहिला व त्यांनी वेगळे पाऊल उचलले ही प्रेरक घटना होय.परिसरातील लोकांनी अशा पर्यावरण पूरक गोष्टी करायला हव्यात.

    प्रा.पुरुषोत्तम गाढे,सौन्दळा

Previous Post Next Post