हिंस्त्र वन्य पशुने क्रूर हल्ला करून गौवंश फाडला... शेतकरी भयग्रस्त...
प्रशांत भोपळे/हिवरखेड....
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हिवरखेड नजीकच्या परिसरात पट्टेदार वाघ आणि बिबट यांचा मुक्त संचार असल्याचे अनेक शेतकरी आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. या हिंस्त्र वन्यप्राण्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे.अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजिकच्या आदिवासी ग्राम चंदनपुर रेल्वे स्टेशन येथे आज दि 3 एप्रिल गुरुवारच्या पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे सर्वत्र महावितरण ची बत्ती पूर्णपणे गुल्ल होती. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत हिंस्त्र वन्य पशुने अमर सिंग मसाने यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव गोऱ्याचा फडशा फाडून टाकला. गोरा बांधलेला असल्यामुळे त्याला बचावाची संधीच मिळाली नाही व तो जागीच गतप्राण झाला. या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघ आणि बिबट सह अनेक हिंस्र वन्य पशुंचा मोकाट वावर असल्याने आणि महावितरण ची बत्ती गुल्य असल्याने अंधारामुळे हा हल्ला नेमका वाघाने केला की बिबटने याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही. सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसून दुसऱ्याच्या हद्दीत येतो असे सांगून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. त्यानंतर बऱ्याच वेळाने वनविभागाचे झरी येथील सोळंके हे पंचनाम्यासाठी आले असून पंचनामा सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
