रखडलेल्या पुलाच्या (रस्त्याच्या) कामामुळे नागरिक हैराण..मुख्य रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.नागरिकांमध्ये रोष व असंतोष: पाच महिन्यांपासून काम प्रलंबित..!
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे दर मंगळवारी आठवड्याचा बाजार हा खाद्यपदार्थांनी भरलेला असतो. संग्रामपूर, नांदुरा, खामगाव, मुक्ताई नगर इत्यादी तालुक्यांतील नागरिक आणि दुकानदार मोठ्या संख्येने या बाजारात येतात; मात्र, बाजार रोडवरील पुलाच्या समोरील रस्त्याचे खोदकाम गेल्या चार-पाच महिन्यांपासून अपूर्ण आहे.यामुळे बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.मान्सूनपूर्व पावसामुळे खोदलेल्या मातीचे चिखलात रूपांतर झाल्याने नागरिकांच्या त्रासात वाढ झाली आहे. नियमित मान्सून हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यांवरून गावातील रहिवाशांसह बाजारात येणाऱ्या नागरिकांनाही प्रवास करणे कठीण होत आहे.
--संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष--
रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे आणि ग्रामपंचायत, संबंधित विभाग आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष का करत आहेत असा सवाल येथील नागरिक विचारात आहे. पुलाचे काम पुढे ढकलल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ आणि ग्रामस्थांचा दळणवळणावर परिणाम झाला आहे. व्यापारी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रखडलेले रस्ते आणि पुलाचे काम पूर्ण करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.