खामगावच्या सुटाळपुरा भागातील मायलेकींचा पाण्यात बुडुन अंत...देवीच्या दर्शनानंतर मृत्यूच्या कुशीत...!
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी येथे दर्शनानंतर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या खामगावच्या मायलेकींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज (१५ जून) दुपारी दोन वाजता घडली असून या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.खामगावच्या सुटाळपुरा भागातील पूनम मयूर जामोदे (वय ३२) व तिची पाच वर्षांची मुलगी आर्वी मयूर जामोदे या देवीचे दर्शन घेऊन नदीपात्रात अंघोळ करत असताना पाय घसरून पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी सोबत असलेल्या संध्या सागर जामोदे (३४) व राधा गजानन जामोदे (५४) यांनीही पाण्यात झेप घेतली, मात्र त्या स्वतःच डुबायला लागल्या. यावेळी जवळच पूजन करत असलेले कृष्णा काळे (रा. चांदूर बिस्वा) आणि संतोष पठाडे (रा. केदार) यांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धावत जाऊन धाडसाने दोघींना बाहेर काढले.चारही महिलांना तातडीने डॉ. चेतन जाधव यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पूनम आणि तिची चिमुरडी आर्वी यांचा मृत्यू झाला. त्यांचे नाकातोंडात पाणी गेल्याने श्वास घेता न आल्याने हे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.घटनेची माहिती मिळताच शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, नगरसेवक अनिल बगाडे आणि पत्रकार अशोक रावणकार यांनी रुग्णालयात धाव घेतली. मलकापूर पोलीसांनी घटनेची नोंद घेत शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवले असून संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.