सय्यद शकिल/अकोट..
आलमपूर शेत शिवारात विद्युत तारेच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत आनंद बागाणी या शेतकऱ्याची शेतातील झोपडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामध्ये पिंकलरचा शर्ट व ड्रिप चे बंडल व पाच संत्रा झाडे जाबाचे झाड सिताफळ झाड व दोन आंब्याचे झाडे व शेतीचे साहित्य जळून खाक झाले त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेताजवळून जाणाऱ्या विद्युत तारा एकमेकांवर आदळल्याने ठिणग्या उडाल्या. या ठिणग्यांमुळे शेतात उभारलेल्या झोपडीला आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि झोपडीतील सर्व शेती साहित्य जळून गेले.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे पूर्ण नुकसान टाळता आले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. जुने व सैल झालेले विद्युत तारे त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
