दिनांक.२८ एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यात आकडेबहाद्दराविरूध्द महावितरणने जोरदार मोहीम हाती घेतली आहे.अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी पथकासह बहीरम व मुक्तागीरी या कृषी फीडरची तपासणी केली असता सरासरी हजार फुटापर्यंत केबल टाकून ३१ ठिकाणी अनाधिकृत वीज वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार महावितरणने उघड करत कारवाई केली. जिल्ह्यात शेतीला सुरळीत वीज पुरवठ्याला वीज चोरी मुख्य अडथळा निर्माण होत आहे. आकडेबहाद्दरामुळे रोहीत्रे अती भारीत झाल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.शिवाय विजेच्या अनाधिकृत वापरामुळे वीज टंचाईच्या परिस्थितीत विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महावितरणने केलेल्या कारवाईमुळे व महावितरणची कारवाईची चाहूल लागताच काही लोकांनी आकोडे काढल्यामुळे बहीरम व मुक्तागीरी कृषी फिडरवरील विजेचा भार ४० एम्पीयर म्हणजेच सुमारे ८०० एचपीने कमी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आकडेबहाद्दरावर कारवाई करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे.या मोहीमेचाच भाग म्हणून काल बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी अचलपूर विभागातील बहीरम व मुक्तीगीरी या कृषी फिडरची तपासणी करण्यात आल्यानंतर ३१ आकडेबहाद्दरावर कारवाई करण्यात आली.विशेष म्हणजे या आकडेबहाद्दरांकडून वीज चोरीसाठी अत्यंत महागडी आणि सरासरी १००० फुटापर्यंतची केबल वापरण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी महावितरणकडून कारवाई करत लाखो रूपयाची केबल जप्त करण्यात आली. बहीरम व मुक्तागीरी फिडरच्या तपासणीसाठी उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर यांच्या नेतृत्वात ३ सहाय्यक अभियंते व २५ जनमित्राचे पथक तयार करून तपासणी करण्यात आली. कृषी फीडर असल्याने मोटरसायकल घेऊन स्वत: अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे व अचलपूर कार्यकारी अभियंता संजय शृंगारे या मोहीमेत बांधा-बाधाने फिरत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. महावितरणकडून जिल्हाभर आकडेबहाद्दरांविरूध्द मोहीम तीव्र करण्यात आली आहे.शिवाय आकडेबहाद्दरांवर दंडासह नियमानुसार कायदेशिर कारवाईची प्रक्रीयाही राबविण्यात येणार आहे.
