स्वराज्याच्या मनावर आणि पस्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावर छत्रपती विराजमान.शिवराय ते छत्रपती शिवप्रेमींचे चर्चासत्र संपन्न.रामराज्याची संकल्पना स्वराज्यातून छत्रपतींनी कृतीप्रवण केली..विचारवंत दिलीप मोरे.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
पस्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावर आणि स्वराज्यातील मावळ्यांच्या मनावर सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजीराजे भोसले विराजमान झाले. त्यामुळेच रामराज्याची संकल्पना स्वराज्याच्या माध्यमातून कृती प्रवण झाली. सप्तनद्यांचा जलाभिषेक, दुग्ध अभिषेक,जगदीश्वराचे दर्शन, हत्तीवरून मिरवणूक, स्वराज्यातील मावळ्यांसह डज, पोर्तुगीज,इंग्रज यासह हिंदुस्थानातील सरदार, राजे, महाराजांच्या उपस्थितीत शिवरायांना छत्रपती घोषित करण्यात आले. हा नेत्रदीपक सोहळा 351 वर्षानंतरही स्वराज्यातील मावळ्यांच्या हृदयात आजही जिवंत आहे. यावरूनच छत्रपती शिवरायांचे कर्तुत्व,नेतृत्व आणि दातृत्व सिद्ध होते. असे मत आदिवासी नेते शिवविचारवंत दिलीपराव मोरे यांनी व्यक्त केले. बुलढाणा शहरात छत्रपती शिवरायांच्या 352 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने सहा जूनला सायंकाळी शिवराय ते छत्रपती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन शिवप्रेमी संघटना आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानातून करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवरायांना मानवंदना देताना मोरे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.यावेळी शिवविचार पिठावर शिव विचारवंत इंजि.शिवाजी जोहरे,ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील,नारायणराव भाकडे, भूपेश पाटील, सुशांत पाटील, सखाराम अवकाळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिव पोवाड्याने सामूहिक मानवंदना देऊन छत्रपतींना माल्यार्पण करीत चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली.यावेळी चर्चा सत्रामध्ये उमेश श्रीवास्तव, सुरेखाताई निकाळजे, अतुल सोनुने, बाबुराव शेलार, कमलाकर व्यवहारे, विनोद ठाकरे, पंचफुलाबाई गवई, अनुसयाताई पवार, आशाताई गायकवाड, विठ्ठल वाघ, संजय येंडोले, इमरान शाह, शेख अफसर, विशाल राणे, सतीश हिवरकर यासह शिवप्रेमींनी सहभाग घेत शिवराज्याभिषेक दिन आणि शिवराय ते छत्रपती या विषयावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक पुंजाजी गायकवाड, संचालन सिंधुताई अहेर तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम व्यवहारे पाटील यांनी व्यक्त केले.
_
चर्चासत्रातील शिव विचार..
महिलांना सन्मान देणारे शिवराय वयाच्या 17 व्या वर्षी छत्रपती झाले. राष्ट्रमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले यांचा छावा स्वराज्याचा छत्रपती झाल्यामुळे गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या गेल्या. आदिवासींसह अठरापगड जाती धर्माचा सन्मान स्वराज्याचा आधारस्तंभ झाला. शत्रुंनीही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनीतीचा आदर्श मान्य केला. आजही छत्रपती शिवरायांचा आदर्श महाराष्ट्रात,देशात नव्हे तर जगात घेतल्या जातो. हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या कर्तुत्वाची महानता आहे. शेती,पाणी,सुरक्षा,संस्कृती,धर्म, संस्कार,शौर्य प्रताप, सैन्यदल अशा असंख्य आघाड्यावर छत्रपतींनी निर्माण केलेला आदर्श आजही आदर्शच आहे. यासह छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करीत दोन सत्रात चर्चासत्र संपन्न झाले.
__
यशस्वीतेसाठी शिवप्रेमी संघटनांचे आयोजन.
चर्चासत्रासाठी छत्रपती स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा जिल्हा, राष्ट्रीय बजरंग दल, ग्राम स्वराज्य समिती, महानायक विचारमंच, किसान ब्रिगेड, राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती यासह शिवप्रेमींनी बहुसंख्येने सहभाग घेत यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.