शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विश्वपदयात्रा;बुलडाण्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत...
बुलढाणा, दि. 18 (जिमाका):
जनतेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विश्वशांती विश्वपदयात्रा घेणारी पर्वतारोहींची चमू बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली आहे. या विश्व पदयात्रेचे नेतृत्व करणाऱ्या गिनीज बुक व लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अवध बिहारी लाल यांच्या चमूने सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेतली.ही यात्रा डेंजर्स अॅडव्हेंचर्स अंतरवेद स्पोर्ट्सतर्फे राबविण्यात येत आहे. या चमूत जितेंद्र प्रताप, महेन्द्र प्रताप, गोविंदा नंद हे पर्वतारोही सहभागी आहेत. या यात्रेने आतापर्यंत ११ देशांमध्ये एकूण ४.४८ लाख किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला असून, २०१८ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली. यात्रेच्या माध्यमातून १४ कोटी ५० लाख वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.देशभरातील ६०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये ही पदयात्रा झाली असून, उत्तराखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, तसेच दमन-दीव व दादरा नगर हवेलीमध्येही जनजागृती कार्यक्रम राबवले गेले आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी २९ जिल्ह्यांमध्ये यात्रा झाली असून त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात आरटीओ, वनविभाग यांच्या समवेत विविध उपक्रम राबवले.या यात्रेचा उद्देश केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करणे आहे, ज्यात पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, पर्वत व नदी संरक्षण, बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ, रस्ते सुरक्षेसंदर्भातील जनजागृती, जलसंवर्धन, स्वच्छ भारत मिशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. या यात्रेअंतर्गत शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती व सार्वजनिक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी, व्याख्याने व जनजागृती कार्यक्रम राबवले जात असल्याची माहिती जितेंद्र प्रताप यांनी जिल्हाधिकारी डॉ पाटील यांना दिली.