जळगाव जामोद(प्रतिनिधी):
सध्याच्या काळात पालकांमध्ये आपल्या पाल्यांना महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रवेश देण्याची जणू चढाओढ लागली आहे. मात्र, या प्रवाहाच्या उलट जाऊन आसलगाव येथील आदर्श शिक्षक दांपत्य दिलीप जानराव वानखडे आणि सुनीताताई दिलीप वानखडे यांनी एक धाडसी व अनुकरणीय निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या सुपुत्र चि. शर्व दिलीप वानखडे याचा प्रवेश चक्क स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरीमध्ये करून शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आजही अनेक पालकांचा असा समज आहे की, गुणवत्तापूर्ण शिक्षण केवळ खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतच मिळते. मात्र, स्वतः शिक्षक असूनही वानखडे दांपत्याने आपल्या मुलासाठी जिल्हा परिषद शाळेची निवड करून या समजुतीला चपराक दिली आहे. सरकारी शाळांमधील गुणवत्ता, संस्कारक्षम वातावरण आणि अनुभवी शिक्षकांवर त्यांनी दाखवलेला विश्वास हा इतर पालकांसाठी मोठा धडा आहे.
वानखडे दांपत्याच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. याबद्दल बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले की, "केवळ वर्गात शिकवून शिक्षक होत नाही, तर आपल्या आचरणातून समाजाला नवी दिशा दाखवणारा खरा शिक्षक असतो, तेच दिलीप वानखडे यांनी सिद्ध केले आहे.""गुणवत्ता ही शाळेच्या इमारतीत किंवा फीच्या आकड्यांत नसते, ती शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीत आणि शाळेच्या संस्कारांत असते. आमच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत घालून आम्हाला अभिमान वाटत आहे," अशी भावना वानखडे दांपत्याने व्यक्त केली.शिक्षक पालकांनीच जिल्हा परिषद शाळांवर विश्वास दाखवल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या कृतीतून सरकारी शाळांमधील विद्यार्थीकेंद्रित वातावरण आणि तिथे दिले जाणारे दर्जेदार शिक्षण यावर शिक्कामोर्तब झाले आहे.या अनुकरणीय निर्णयाबद्दल दिलीप वानखडे आणि सुनीताताई वानखडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या या सकारात्मक पाऊलामुळे अनेक पालकांना आपल्या पाल्यांच्या शाळा निवडीबाबत पुनर्विचार करण्याची प्रेरणा मिळेल, हे नक्की!
