बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...
राजूर घाटातील हनुमान मंदिर जवळील पहिल्याच वळणावर रस्त्यालगत असलेल्या डोंगराची कड पावसामुळे मोठ्या प्रमाणात सैल झाली असून, डोंगराचा काही भाग व दरड कोसळण्याच्या स्थितीत आला आहे. मातीचे थर व दगड सैल झाल्याने सध्या पावसाळा सुरू असून पावसाचा जोर वाढल्यास अचानक दरड रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी थेट धोक्याच्या राजूर घाटातील हा परिसर केवळ वाहनांची वाहतूक असलेला मार्ग नसून, सकाळच्या वेळेत मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धावण्याच्या सरावासाठी या रनिंग ट्रॅकचा नियमित वापर करतात.दररोज सकाळी अनेक नागरिक आणि युवक-युवती या परिसरात व्यायाम व रनिंगचा सराव करतात. त्यामुळे डोंगराचा सैल झालेला भाग अचानक कोसळल्यास केवळ वाहनचालकच नव्हे, तर रनिंग ट्रॅकवर सराव करणारे विद्यार्थी आणि मॉर्निंग वॉक करणारे नागरिकही थेट धोक्याच्या कक्षेत येऊ शकतात.डोंगराच्या उतारावर सैल झालेली माती, दगड व खडक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. सततच्या पावसामुळे जमिनीची पकड आणखी कमी झाल्यास हे दगड व माती थेट रस्त्यावर येऊ शकतात. अशा परिस्थितीत वाहनांची वाहतूक प्रभावित होण्यासोबतच गंभीर दुर्घटना व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची कार्यवाही आवश्यक
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन व स्थानिक प्रशासनाने सदर धोकादायक ठिकाणाची तातडीने पाहणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सैल झालेली माती व दगड सुरक्षित पद्धतीने हटवून त्यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी. तसेच डोंगर उताराची तांत्रिक तपासणी करून आवश्यकतेनुसार संरक्षक भिंत, रिटेनिंग वॉल, सुरक्षा जाळी, बॅरिकेडिंग आणि सूचना फलक उभारण्यात यावेत.पावसाळ्यात या ठिकाणी नियमित पाहणी व देखरेख ठेवणे आवश्यक असून, परिस्थिती गंभीर झाल्यास वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.राजूर घाटातील सदर धोकादायक भागाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर मदतकार्य करण्यापेक्षा त्यापूर्वीच दरड, माती व सैल दगड हटवून रस्ता सुरक्षित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी आणि पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणारे शेख तौसिफ शेख हमीद,शेख अफसर शेख अकबर इम्रान शाह, पवन मगरे ,सागर येरवड, वाहन चालक करीम खान विलास हरामकर आदी नागरिकांकडून होत आहे.
